शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

Thursday, August 4, 2011

पाचवा वेद

'चार वेद केले बरमदेवानं अन् पाचव्या वेदाची वानी केली तुकोबा रायानं'
हे वचन आहे, आपल्या गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनातले. गाडगेबाबा तसा अंगठेबहाद्दर माणूस. कोण्या शाळेत गेला नाही. कोण्या विद्यापीठात शिकला नाही. पीएचडी केलं नाही. डी.लिट. मिळविली नाही. तथाकथित विद्वानही झाला नाही. पण त्यांनी तुकोबाच्या गाथेचे जे मूल्यमापन केले आणि फक्त दोनच शब्दात केले, त्याला जागतिक वाड्मयात तोड नाही. कोणते आहेत बरं ते दोन शब्द?
पाचवा वेद हे आहेत ते दोन शब्द ! तुकोबाची गाथा म्हणजे पाचवा वेद!
आपल्या महाराष्ट्रापासून तो रशियासारख्या महा-राष्ट्रातल्या अनेक विद्यापीठात तुकारामाच्या अभंगाचा अभ्यास झाला. त्यावर अनेक संशोधने झाली. कित्येक भाष्ये लिहिली गेली; पण त्या सर्वांना भारी आहेत, गाडगेबाबांचे दोनच शब्द-पाचवा वेद. तुकोबाची गाथा म्हणजे पाचवा वेद. गाडगेबाबासारखा निरक्षर संत तुकारामाच्या अक्षर वाड्मयाला पाचवा वेद का म्हणतो? हे जरा आपण समजून घेतले पाहिजे. ह्या पाचव्या वेदाअगोदरचे चार वेद कोणते?
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, हे चार वेद ब्रह्मदेवानं केले असे मानले जाते. हे सर्व वेद संस्कृत भाषेत आहेत. त्या काळी संस्कृत भाषेला देवाची भाषा-देववाणी म्हटली जात असे आणि काही मूठभर लोकांनाच ती लिहिता वाचता येत असे. त्यामुळे वेदान्ताचे ज्ञान साहजिकच समाजातील विशिष्ट लोकांपर्यंतच पोचायचे आणि संख्येने फार मोठा असलेला वर्ग त्या ज्ञानापासून वंचित राहायचा.
याविरुद्ध पहिले बंड पुकारले ते चक्रधरांनी. महानुभव पंथाचे ग्रंथ मराठीतून लिहिले गेले पाहिजे, असा त्यांचा आपल्या शिष्यांना आग्रहच होता. दुसरे बंड केले ते संत ज्ञानदेवांनी. संस्कृत भाषेत अडकलेल्या गीतेच्या तत्वज्ञानाला त्यांनी पहिल्यांदा जनसामान्यांच्या भाषेत आणले ते आपल्या ज्ञानेश्‍वरीत अठराव्या अध्यायात वेदांवर मार्मिक टीका करताना ज्ञानेश्‍वर म्हणतात..
वेदु संपन्न होय ठाई । परि कृपणु आन नाही ।
जे कानी लागला तिही । वर्णाचांचि ।।
वेद आपल्या जागी संपन्न म्हणजे ऐश्‍वर्यवान आहेत. समृद्ध आहेत. एकप्रकारे श्रीमंत आहेत परंतु त्यांच्यासारखे कृपण म्हणजेच कद्रू- कंजूष दुसरे कोणी नाही. कारण ते फक्त तीनच वर्णांच्या कानी लागतात, ते तीन वर्ण कोणते ? ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य. वेदपठणाचा अधिकार ब्राह्मणांना आणि ते ऐकण्याची सवलत क्षत्रिय आणि वैश्यांना. शूद्रांना ते ऐकण्याचीही उजागिरी नव्हती म्हणूनच ज्ञानेश्‍वर समाजाच्या बंदिस्त चौकटीविरुद्ध बंडाळी करतात आणि वेदांना 'कृपण' म्हणतात. कद्रू म्हणतात. कंजूष म्हणतात. ज्ञानेश्‍वरांच्या काळी 'कृपण' या शब्दाने काय हाहाकार माजविला असेल, याची कल्पना आपल्याला येऊ शकते.तेराव्या शतकातले ज्ञानेश्‍वर, सतराव्या शतकातले तुकाराम आणि विसाव्या शतकातले गाडगेबाबा हे तिघेही आपआपल्या काळातले थोर बंडखोरच होत. ज्या चौथ्या वर्णासाठी ज्ञानेश्‍वरांनी प्राकृत भाषेत ज्ञानेश्‍वरी सांगितली, त्याच चौथ्या वर्णाच्या लोकभाषेत तुकोबा आपले अभंग बोलले.
ज्ञानदेवे रचला पाया । तुका झालासे कळस ।।
ज्ञानदेवांनी बंडखोरीचा पाया रचला तर तुकोबांनी कळस गाठला. तुकोबाराय म्हणतात, शास्त्राचा अर्थ केवळ आम्हालाच ठाऊक आहे. म्हणजेच देवाचे खरे स्वरूप फक्त आम्हीच जाणतो. या आत्मविश्‍वासपूर्ण अभंगवाणीला गाडगेबाबा पाचवा वेद म्हणतात ते किती सार्थ आहे, हे आपल्याला पटते. जे भंगत नाही ते अभंग काळाच्या अखंड प्रवाहात तुकोबाचे बोल, तुकोबाची वाणी घट्ट पाय रोवून उभी आहे, म्हणूनच तर तिला आपण 'अभंग'वाणी

Wednesday, August 3, 2011

सावळ्याचे मूळ आणि अभंगांचे रिमिक्स



विठू माउली हे महाराष्ट्राचं लाडकं दैवत. आषाढी एकादशी ही वारकर्‍यांची दिवाळी. वर्षभर प्रपंचाचा सासुरवास सोसणार्‍या सुनवायरीने ज्या आतुरतेने दिवाळीच्या सणाची वाट पहावी तसं वारकर्‍यांचं मन आषाढी एकादशीची वाट पाहातं. त्या मनाला माहेपणाची आस लागते.
‘दिवाळीच्या मुळा
लेकी आसावली
पाहतसे वाटुली
पंढरीची.’

सबंध महाराष्ट्रातून अशा लाखो लेकी माउलीच्या भेटीसाठी पायी निघतात. मुखाने हरिनामाचा गजर चालेला असतो. कधी पाउली...कधी रिंगण...कधी फुगडी...कधी कीर्तन...कधी गोंधळ... पांडुरंगाच्या नाम स्मरणात वारकर्‍यांचा थकला भागला जीव रंगून जातो... दंगून जातो. देहभान विसरतो... संसाराच्या सुख-दु:खांचं काही देणं-घेणं या जीवाला नसतं.
वार्‍याच्या हाती बोलावणं येते आणि वारकर्‍यांचे पाय पंढरीच्या ओढीने चालू लागतात. ‘मूळ’ या मराठमोळ्या शब्दाचा अर्थच ‘न्यावयाला येणं’ असा आहे. संतांच्या अभंगांची भाषा ही अस्सल देशीवाणाची आहे. म्हणूनच तर ती अमृताशी पैजा जिंकते.

‘अरडी एवढी परडी गं
परडी एवढं फूल गं
दारी मूल कोण गं
दारी मूल सासरा गं”

भोंडल्याच्या ह्या गाण्यातलं ‘मूल’ म्हणजे ही ‘मूळ’. लोकभाषेत बोलणार्‍या दुसर्‍या एका अभंगात ‘मूळ’ हा शब्द पुन्हा एकदा आपल्याला भेटतो-
‘मुंगीचिया घरा
कोण जाय मूळ
देखोनिया गूळ
धाव घाली.’

मुंग्यांच्या घरी कोणी बोलावणं धाडत नाही की चला चला त्या तिकडे गूळ आहे. गुळाच्या गोडीनं त्या आकर्षित होतात. धावत सुटतात. पण त्या कधीही रांग मोडत नाहीत. धक्के देऊन एकमेकींना रांगेबाहेर काढत नाहीत. पायात पाय घालून सोबतिणींना पाडत नाहीत. अमकीच्या आधी मला गूळ मिळाला पाहिजे. तमकीपेक्षा थोडा जास्त मिळाला पाहिजे. म्हणून हेवादावा करीत नाहीत. रांग न मोडता निमूटपणे चालत राहतात... आपला नंबर येण्याची वाट पाहतात... आणि सगळ्या सुखी होतात...
मुंग्यांना जे साधलं ते लेकाचं माणसांना का जमत नाही. संपूर्ण निसर्गात माणूसच असा एकमेव प्राणी आहे. ज्याला जगण्याची फार घाई आहे. जगण्याच्या ह्या घाईला विज्ञानानं जी गती दिली ती जीवघेणी आहे. त्या गतीनं प्रगती व्हायला पाहिजे होतं पण ती अधोगती होताना दिसते आहे. माणसाचं मन आज कमालीचं अशांत आहे. जेवणासाठी पंचपक्वानांचं भोजन तयार आहे. पण अन्नावरची वासना उडाली आहे. पहुडण्यासाठी मऊ बिछाना तयार आहे पण झोप कुठच्या कुठं पळाली आहे.
‘कोठुनी येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
येथे नाही, तेथे नाही
काय पाहिजे मिळवायाला. ’
अशी काहीशी आपली अवस्था झाली आहे. अशा अवस्थेतच ‘भवताप’ या शब्दाचा अर्थ आपल्या जाणीवेच्या कक्षेत प्रवेश करु लागतो. त्याच्या आशयाची प्रचिती आपल्याला येऊ लागते. मनाची लेक सासुरवास भोगू लागते... दमते... थकते... माहेरपणासाठी आसावते. आषाढीच्या निमित्तानं दिवाळीचं मूळ येतं. मग ती हरिखते. उल्हासित होते. आणि मग...पाउले चालती पंढरीची वाट...
अठ्ठावीस युगापासून कटेवर कर ठेऊन विटेवर उभे असलेले हे सुंदर ध्यान पाहून संतांना वेड लागले. ह्या ध्यानानं उभा-आडवा महाराष्ट्र झपाटला आहे. शब्दांचे जोडकाम करणारे बिचारे कवी-लेखकही त्यातून सुटले नाहीत. ‘एक तरी ओवी अनुभवावी’ च्या चालीवर ‘एक तरी वारी पैदल चालावी’ असा संकल्प त्यांच्याकडून सोडला जातो. कधी तो सिद्घीस जातो. कधी तो प्रसिद्घीस जातो.
कोणे एके काळी एका नामवंत लेखिकेने अशीच वारी केली म्हणतात. तिनं तिच्या पद्घतीनं तिच्या भाषेत, तिच्या शैलीत म्हटलं म्हणतात, ‘विठ्ठल हा माझा बॉय फ्रेंड आहे.’ त्या काळात तिचं हे विधान खूप गाजलंही होत म्हणतात. खरंतर तिला म्हणायचं असेल, विठ्ठल हा माझा मित्र आहे. सखा आहे. अगदी संत जनाबाईला वाटतो तसा जीवलग आहे. तुकोबारायांनी नाही का मधुराभक्तीच्या अंगानं म्हटलं-
‘घररिघी झाली
पट्टराणी बळे
वरिले सावळे
परब्रह्म.’

सावळ्या परब्रह्माला वरण्यासाठी मी त्याचं घर निघाले. आणि माझ्या भावभक्तिच्या बलाने मी त्याची पट्टराणी झाले. ‘घरनिघी’पासून ‘पट्टराणी’ झालेली तुकोबाची भावावस्था आपण सहजपणे स्वीकारली. पण ‘बॉयफ्रेंड’ स्वीकारणं आपल्याला जड गेलं. अभिव्यक्तीचं माध्यम बदललं की काय गहजब होऊ शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.
आज हे सगळं पुन्हा एकदा आठवण्याचं कारण असं की काही कॅसेट कंपन्यांनी संतांच्या अभंगांचं रिमिक्स करून वारीच्या निमित्तानं त्याचा अक्षरश: ‘धंदा’ करण्याचं ठरवलं. त्याला वारकर्‍यांनी विरोध केला. आपण नुसती कल्पना केली की ‘मुन्नी बदनाम हुई’ किंवा ‘शीला की जवानी’ या सुपरडुपर ‘हिट’ सिनेगीतांच्या चालीवर आपण संतांचे अभंग ऐकतो आहोत तर आपल्या भाविक मनाची काय अवस्था होईल? वारक‍र्‍यांचा हा विरोध केवळ सात्विकच नाही तर ती त्यांची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. मंगलाष्टकं जशी परंपरागत चालीत प्रभावी वाटतात. तसेच अभंग ही पारंपारिक सुरावटीतच आपल्या मनाला भावतात. ‘मेणाहून मऊ असलेल्या विष्णूदासांना वज्रास भेदण्याएवढे कठीण’होण्याचा हा प्रसंग आहे. आठशे वर्षाहून जुना आपला अस्सल देशीवाणाचा ठेवा जतन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने वारकर्‍यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. प्रखर आणि तीव्र विरोध केला पाहिजे.आणि विठ्ठल भक्तीचा ‘धंदा’ करणार्‍यांचा डाव हाणून पाडला पाहिजे.

‘दया तिचे नाव
भुतांचे पालन’

अशी ‘दया’ ह्या शब्दाची व्याख्या करताना तुकोबारायाच्या अभंगातील अर्धाच भाग नेहमी सांगितल्या जातो. त्याच अभंगाचा उरलेला अर्धा भाग ह्या व्याख्येत जोडल्या शिवाय ती व्याख्या संपूर्ण होत नाही-
‘दया तिचे नाव
भुतांचे पालन
आणि निर्दालन
कंटकांचे.’




- श्रीकृष्ण राऊत

कविता-रती : पाव शतक


अकोल्याच्या गझलवेड्याची गोष्ट